लव्हुरी ते कोठी यमाईवस्ती रस्त्यावर मुरुम टाकून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी. तहसीलदार यांच्याकडे नागरिकांची मागणी
अन्यथा १९ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालया समोर आत्मदहन करण्याचा नागरीकांचा इशारा.
केज/प्रतिनिधी
केज तालुक्यातील लव्हुरी येथील लव्हुरी ते कोठी यमाई वस्ती रस्त्यावर मुरुम टाकून तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी या मागणीचे लेखी निवेदन तहसीलदार केज यांना ग्रामस्थांनी दिले आहे जर सदर काम दिनांक १८ ऑगस्ट रोजी पर्यंत केले नाही तर दि.१९ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोरआत्मदहन करण्यात येईल असा इशारा लव्हुरी येथील नागरिकांनी दिला आहे.
या बाबतची सविस्तर माहिती अशी की,केज तालुक्यातील लव्हुरी येथील लव्हुरी ते कोठी, यमाईवस्ती रस्त्यावर जल जीवन योजने अंतर्गत गुत्तेदाराने पाईपलाईनचे काम रस्त्याच्या मधोमध केलेले आहे त्यामुळे सदर रस्ता पूर्ण नादुरुस्त झालेला आहे.सध्या पावसाळ्याचे दिवस चालू आहेत सध्या रस्ता हा नादुरुस्त झाला आहे या रस्त्यावरून शाळेचे विद्यार्थी नागरिक हे रोज येजा करत असताना त्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे.ठिक ठिकाणी पाणी साठवून चिखलाचे डेरे बनले आहेत.त्यामुळेनागरिकांना व विद्यार्थ्यांना स्वतःचा जीव धोक्यात घेऊन या रस्त्यावरून चालावा लागत आहे.सदर रस्त्या वरून दोन चाकी वाहन देखील चालवता येत नाही तसेच बैलगाडी सुद्धा नेता आणता येत नाही असे आमच्या प्रतिनिधीशी बोलताना नागरिकांनी सांगितले आहे.सदर रस्ता हा नादुरुस्त झाल्यामुळे त्या संबंधी उपअभियंता ग्रामीण पाणी पुरवठा केज यांना तीन वेळेस लेखी तक्रारी अर्ज केलेला आहे. परंतु अद्यापही कसल्याच प्रकारची त्यांनी दखल घेतली नाही.तसेच दिनांक ४ जुलै २०२४ रोजी उप अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा केज यांनी स्थळ पाहणी करून रस्ता नादुरुस्त असल्याबाबत अहवाल देऊन ठेकेदारांना नोटीस काढली आहे.
दिनांक ९ ऑगस्ट २०२४ रोजी एक चौकशी समिती गठीत करण्यात आली होती.चौकशी समितीने पाहणी करून सदर रस्ता हा नादुरुस्त असल्याचे पंचनामा केला.सदर ठेकेदाराने चौकशी समिती समोर दिनांक १२ ऑगस्ट पूर्वी सदर रस्त्यावर मुरूम टाकून रस्ता दुरुस्त करून देतो असे सांगितले व चौकशी समितीने तसा पंचनामा देखील केलेला आहे.परंतु सदरील गुतेदारांनी अद्यापही रस्त्याच्या दुरुस्तीचे काम केलेले नाही म्हणूनदिनांक १३ ऑगस्ट २०२४ रोजी ग्रामस्थ पंचायत समिती केज येथे ग्रामीण पाणी पुरवठा योजनेचे उप अभियंता यांची भेट घेण्या साठी आले असता त्यांनी काही चर्चा न करता ग्रामस्थांना पाहून निघून गेल्या हा सर्व प्रकार ठेकेदारांना पाठीशी घालण्याचा प्रकार आहे. त्यामुळे त्यांच्यावरकारवाई करण्यात यावी असे लेखी निवेदनात ग्रामस्थांनी म्हटले आहे.तसेच दि.१८ ऑगस्टपर्यंत रस्ता दुरुस्ती न केल्यास दिनांक १९ ऑगस्ट रोजी पंचायत समिती कार्यालयासमोर आत्मदहन करण्यात येईल असा इशारा देखील देण्यात आला आहे. आमच्या प्रतिनिधीशी बोलताना ग्रामस्थ म्हणाले की,अनेक वेळा ग्राम पंचायतने सदर कामा संदर्भाने पाठपुरावा केला आहे परंतु या कार्यालयाचे अधिकारी कर्मचारी हे सतत उडवाउडवीचे उत्तरे देऊन गुतेदाराला पाठीशी घालण्याचे काम करत आहेत.खासदार बजरंग सोनवणे यांनी देखील सदर कार्यालयास सदर रस्त्याच्या कामाच्या अनुषंगाने पत्र दिले होते. त्या पत्राच्या अनुषंगाने फक्त चौकशी समिती गठित करून पंचनामा केला परंतु सदर रस्त्याचे काम अद्यापही पूर्ण केले नाही.या लेखी निवेदनावर सरपंच पंडित चाळक, श्रीराम चाळक,रंगनाथ चाळक,सदाशिव चाळक, अशोक चाळक,ज्ञानेश्वर चाळक,गोकुळ चाळक, संतोष चाळक यांच्यासह चोवीस नागरिकांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
लव्हुरी ते कोठी यमाई वस्ती रस्त्याच्या दुरुस्ती च्या कामा संदर्भात ग्राम पंचायत कार्यालयाच्या माध्यमातून व गावातील नागरिकांना सोबत घेऊन अनेक वेळा संबंधित कार्यालयास लेखी तक्रार करून सदर रस्त्याचे काम करण्याची मागणी केली परंतु सदर कार्यालयाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी अद्यापही कसल्याच प्रकारची दखल घेतली नाही.
-सरपंच पंडित वसंतराव चाळक.
ग्रामीण पाणीपुरवठा योजनेच्या उपअभियंता श्रीमती साळवे मॅडम यांना आमच्या प्रतिनिधींनी त्यांच्या मो.नं ९०६७९४८३९२ या दूरध्वनीवर संपर्क साधला असता त्यांनी आमच्या प्रतिनिधी यांचा फोन त्यांनी घेतला नाही.
Post a Comment
0 Comments